अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे अनेक शतकांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे, त्यांना मी नमन करतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. सामाजिक सलोखा हे रामाच्या प्रशासनाचे मूलभूत अंग होते. राम मंदिराची निर्मिती ही देशाच्या एकतेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ते म्हणाले.
संस्कृत मंत्रोच्चारात, सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करत, मास्क परिधान करून कार्यक्रम आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री राम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचे लोकार्पण केले. सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यावेळी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी मोदींनी हनुमानगढी येथे हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पारिजातचे वृक्षारोपण केलं. यावेळी साध्वी उमा भारती, बाबा रामदेव यांच्यासह देशातील सुमारे १३५ संत महंत मिळून १७५ निमंत्रित उपस्थित होते.