मुंबई : राज्यातील मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अजूनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ पाच रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दूध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोनातून बरे होऊन घरी जाणाºया लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथरोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढवण्याची गरज असून विविध प्रकारच्या विषाणूंचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती देण्यात आली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नसल्याची निष्काळजी आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची गरज देखील आहे, अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (महासंवाद)