मुंबई : उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता पदासाठी भारतीय जनता पक्षाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाने भाजपने केलेली याचिका फेटाळून लावल्यामुळे विरोधी पक्षनेता पद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. रवी राजा हे सध्या विरोधी पक्षनेतापदी आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका भाजपने मागे घेतली होती. तसेच, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार बीएमसीमध्ये विरोध पक्षनेता पदासाठी याचिका दाखल केली होती. सत्ताधारी पक्षाखालोखाल आपले नगरसेवक असल्यामुळे विरोधीपक्षपद मिळण्याची मागणी भाजपने पुढे केली होती. आता मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजप सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे वृत्त आहे़ त्याबाबत अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही.